
सांगली | प्रतिनिधी १० एप्रिल २०२६ : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. या योजनांचे लाभ पात्र आणि वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करा, असे निर्देश राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विविध विभागांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.या
या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार इद्रिस नायकवाडी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेले प्रमुख निर्देश:
१. महसूल विभाग: तुकडेबंदी, अतिक्रमण नियमानुकूल करणे आणि पोटखराब जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करावी.
२. घरकुल योजना: घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू मिळण्याबाबत व्यापक जनजागृती करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा.
३. अन्न व पुरवठा: अंत्योदय योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लोकप्रतिनिधींच्या मदतीने शोधून त्यांना या योजनेत समाविष्ट करावे.
४. बनावट औषधे व गुटखा विरोधी मोहीम: सीमाभागातून येणाऱ्या अवैध गुटख्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. तसेच रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांच्या बनावट औषधांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने कडक नजर ठेवावी.
५. महिला सक्षमीकरण: महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रेशन दुकाने, शासकीय कार्यालये आणि उपहारगृहांमध्ये विक्री व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.यंत्रणेने गतिमान व्हावे”कोणतीही योजना कागदावर न राहता ती लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.प्रशासनाने
गतीमान होऊन आणि काटेकोर नियोजन करून काम करावे,” अशा सूचनाही नामदार कदम यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी आपापल्या विभागाचा प्रगती अहवाल सादर केला.