भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

सांगली:आज भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी पालकमंत्री बोलतांना म्हणत होते की; विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 कोटींची तरतूद केली असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले,धरणातील पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापूर टाळता आला. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या. त्यांच्यामुळेच महापूर टाळता आला. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले असून महिलांना आर्थिकरित्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्यात आत्तापर्यंत जवळपास 4 लाख 60 हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी 4 लाख 45 हजाराहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे. या योजनेचे पैसे बुधवार पासून बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आरोग्य, शिक्षण, उर्जा, सामाजिक न्याय, कामगार विभाग, कौशल्य विकास, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. तसेच कामगार विभागाकडून, जिल्ह्यातील कामगारांना शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये 90 हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजने अंतर्गत जवळपास 220 कोटीहून अधिक रूपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.