
सांगली टुडे वृत्तसेवा |
बोलवाड, ता.१३ : मिरज तालुक्यातील बोलवाड येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान अनेक वर्षांपासून बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. पूर्व भागातील पर्यटनासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या २० एकर जागेतील उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे.
या भेटीदरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उद्यानाची सद्यस्थिती जाणून घेतली आणि मिरजेच्या तहसीलदार अर्पणा धुमाळ यांच्यासह सविस्तर चर्चा केली. उद्यानाचे पुनर्विकासाचे (Re-development) काम हाती घेऊन ते पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बंद असलेले हे उद्यान पुन्हा सुरू झाल्यास मिरज पूर्व भागातील पर्यटन आणि जैवविविधता संवर्धनाला चालना मिळेल. यावेळी मंडळ अधिकारी परशुराम ओमासे, तलाठी नागेश वाघमोडे, कोतवाल तानाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते सुनील गुळवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.