
जत, ७ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालय मौजे उमदी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावामुळे संख ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संख येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी सेना एकनाथ शिंदे गट,, संतोष साबूराय कुंभार जत तालुका प्रमुख यांनी (ता.१२) डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणाची हाक दिली आहे. हे उपोषण संख येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात येणार आहे.
कुंभार यांनी उपविभागीय अधिकारी (जत) यांना दिलेल्या निवेदनात संख हे जत तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याचे आणि येथे शासकीय सेवा, दळण-वळण, बाजारपेठ, न्यायालय, महाविद्यालय, वीज वितरण केंद्र यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. सन २०१८ पासून अप्पर तहसीलदार कार्यालयाची कामे संख येथे सुरळीत सुरू असताना, हे कार्यालय हलवण्याचा प्रयत्न होत आहे, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होईल, असे कुंभार यांनी म्हटले आहे
निवेदनात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
- मौजे उमदी येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
- संख येथील महसूल मंडळ व अप्पर तहसीलदार कार्यालय संख येथेच स्थिर ठेवावे.
- संखचे विद्यमान महसूल मंडळ व सेवा कायम ठेवून, तात्काळ संखला तालुका म्हणून घोषित करावे.
प्रशासनाने संख ग्रामस्थांच्या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा संतोष साधुराय कुंभार यांनी दिला आहे. या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या स्थलांतरणाच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.