
४ डिसेंबरपासून सलगरेत श्री सिद्धेश्वर यात्रेचा जल्लोष; पाच दिवसांच्या सोहळ्यासाठी गाव सज्ज
सलगरे, ३ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा): मिरज तालुक्यातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा यंदा पारंपरिक उत्साह आणि जल्लोषात साजरी होणार असून, गुरुवार, ४ डिसेंबर ते सोमवार, ८ डिसेंबर अशा पाच दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे.
तानाजी पाटील यांच्या पुढाकारातून ११ वे वर्ष
सलगरे येथील श्री सिद्धेश्वर हे परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या यात्रेची सुरुवात सलगरे गावाचे माजी सरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून झाली. यंदाच्या यात्रेचे हे अकरावे वर्ष असल्याने आयोजकांनी विशेष तयारी केली आहे.
११ मानाच्या पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा
यंदाच्या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे नैवेद्य सोहळा आणि अकरा मानाच्या पालख्यांची होणारी भेट. परिसरातील पंचक्रोशी भागातून हजारो भाविक या पालखी भेटीच्या सोहळ्यास उपस्थित राहतात. तब्बल अकरा मानाच्या पालख्यांची भेट सलगरेच्या मुख्य चौकात होते आणि हा अभूतपूर्व सोहळा यात्रेचे वैभव वाढवतो.
यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कमिटीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी बैठकीत तयारीचा आढावा घेतला. सध्या यात्रा परिसरात मोठे आकाश पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गाड्या आणि इतर वस्तूंची दुकाने थाटली जात असून यात्रा परिसर सजू लागला आहे.
पाच दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा:
यात्रा कमिटीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, पुढीलप्रमाणे कार्यक्रम पार पडतील:
- गुरुवार, ४ डिसेंबर: महारुद्राभिषेकाने यात्रेला धार्मिक मंगलारंभ होईल. रात्री लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
- शुक्रवार, ५ डिसेंबर: सकाळी लोकनाट्य तमाशा, दुपारी गुग्गुळाचा कार्यक्रम आणि सायंकाळी गोंधळाचा पारंपरिक कार्यक्रम.
- शनिवार, ६ डिसेंबर: पुरणपोळीचा नैवेद्य, भजनाचा कार्यक्रम. तसेच रात्री मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन.
- रविवार, ७ डिसेंबर:
- दुपारी ४:०० वाजता: मानाच्या पालख्यांची भेट (मुख्य सोहळा).
- सायंकाळी ७:०० वाजता: माणिक आरती.
- रात्री ८:०० वाजता: धनगरी ओव्यांचा जागर सोहळा.
- सोमवार, ८ डिसेंबर: विविध स्पर्धा तसेच लावणीच्या बहारदार कार्यक्रमासह यात्रेची सांगता होईल.
यावेळी सर्जेराव पाटील, राजाराम अजेटराव गुरुजी, शिवाजी माळी, देवकर काका, अंकुश एकुंडे, गजानन गुंडेवाडी, रमेश भोसले, शिवाजी माळी, रमेश खरात, सचिन निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा भाविकांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी केले आहे.