सांगली | ब्रेकिंग न्यूज

सांगली, ता.३१: सांगली शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना काल सायंकाळी साडे सातच्या घडली. विश्रामबाग शंभरफुटी रस्त्यावरील 'व्हाईट हाऊस' हॉटेलच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. निखिल रवींद्र साबळे (वय २५, रा. कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र आणि संशयित आरोपी प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. कुपवाड) याने हे क्रूर कृत्य केल्यानंतर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे आणि प्रसाद सुतार हे दोघे मित्र होते. सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर ग्राहक नसताना हे दोघे पहिल्या मजल्यावरील बारमध्ये कोपऱ्यातील टेबलावर दारू पिण्यासाठी बसले. काही वेळातच त्यांच्यात दारू वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला असता, संशयित प्रसाद सुतार याने आपल्या कमरेला असलेला दातरे असलेला धारदार चाकू बाहेर काढला. कोणताही विचार न करता त्याने निखीलच्या गळ्यावर एकाच वार केला. हा वार अत्यंत खोलवर लागल्यामुळे निखीलचा जागीच मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. खून केल्यानंतर प्रसादने तो चाकू त्याच ठिकाणी सोडून हॉटेलमधून बाहेर पळ काढला आणि दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने तो फरार झाला. या घटनेमुळे बारमधील वेटर आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. विशेष बाब म्हणजे, संशयित प्रसाद सुतार याच्यावर २०२३ मध्ये याच 'व्हाईट हाऊस' हॉटेलमध्ये एका व्यक्तीवर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. त्याच हॉटेलमध्ये पुन्हा मित्राचा खून केल्याने नागरिकात चर्चा रंगला होत्या. पोलिसांची पथके संशयीत आरोपीचा मागावर आहेत.