बौद्ध समाजाकडून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार

खटाव (मिरज), ता.२८: तालुका मिरज येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमी शेडसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जन सुविधा योजनेतून सुमारे ७ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांचे खटाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने डिजिटल फलक लावून जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
खटाव येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला गेल्या शंभर वर्षांपासून शेड नसल्यामुळे अंत्यविधी करताना विशेषतः पावसाळ्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. स्मशानभूमीच्या या ज्वलंत समस्येबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांना शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख परशुराम बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली होती. या शिष्टमंडळात हनुमंत कांबळे (तालुका संघटक), किरण कांबळे, मिथुन कांबळे, दत्तू कांबळे, सोमलिंग कांबळे, रवींद्र कांबळे, माजी सरपंच शंकर कांबळे, सागर कदम, संजय कांबळे आणि शाखाप्रमुख विजय कांबळे यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान त्यांनी खटाव येथील बौद्ध स्मशानभूमीची वस्तुस्थिती, तेथील गैरसोयी आणि छायाचित्रे पालकमंत्री व स्वीय सहाय्यक यांना दाखवली.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तातडीने त्यांच्या विशेष फंडातून ‘जन सुविधा योजने’अंतर्गत खटाव येथील बौद्ध स्मशानभूमी शेडसाठी ७ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करून दिला. हा निधी मंजूर झाल्यामुळे खटाव गावातील बौद्ध समाजाची शंभर वर्षांपासूनची अडचण दूर झाली असून, या मदतीबद्दल नामदार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे बौद्ध समाजाच्या वतीने डिजिटल फलक लावून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारे बौद्ध समाजासाठी सहानुभूती दाखवून समाजाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी खटाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.