
सांगली, ता२: तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. हातातोंडाशी आलेला हंगाम पाण्याखाली गेला आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत अधिक खोल गेलेत तर काहींच्या डोळ्यासमोर वर्षभराची मेहनत पाण्यात वाहून गेली. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी आमदार रोहित पाटील तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत. खासदार विशाल पाटील यांनी उपोषण ठिकाणी आमदार रोहित पाटील यांची भेट घेत काही काळ संवाद साधला आणि शेतकऱ्यांना न्यायहक्क मिळवून देण्याच्या या लढाईत समवेत असल्याची ग्वाही दिली. पुढे खासदार म्हणाले की केवळ तासगाव नाही तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.