
कुपवाड , ता.२७ : काल दुपार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुपवाड शहरासह उपनगर परिसरात नागरिकांची दैना उडाली. पावसामुळे मंगळवार बाजार परिसर, महात्मा गांधी कॉलनी, कुपवाड फाटा, लक्ष्मी मंदिर, मंगलमूर्ती कॉलनी, विजयनगर रेल्वे ब्रिज, हसुरेनगर, आनंदनगर यासह उपनगरात पाण्याचा शिरकाव होता. आनंदनगर, मंगलमूर्ती कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, मंगळवार बाजार परिसरातील रहिवासी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने दैना उडाली. शहरी भागास जोडणाऱ्या काही प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने त्यावरून काही काळ वाहतूक बंद होती. शनिवारी (ता.२७) दिवसभर महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजनेसाठी प्रयत्न केले. नैसर्गिक नाल्यातून वाहणारे प्रदूषित पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने त्यांनी संताप व्यक केला. मनपा प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आम्हाला परिस्थितीचा सामना करावाच लागतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दहा ते बारा वर्षांपासून समस्या कायम आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. नागरिकांच्या घरात प्रदूषित पाण्याचा शिरकाव होतो. महापालिकेकडून आजतागायत उपाययोजना झाली नाही. निर्माण परीस्थितीमुळे आरोग्य धोक्यात आहे.
― अतुल कुंभार , महात्मा गांधी कॉलनी
नैसर्गिक नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे समस्या निर्माण झाली. पावसाळ्यापूर्व योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले होते. सध्या मनपाकडून उपनगरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी शनिवार (ता.२७) भेट दिली. पाहणी करून कार्यवाहीचे आदेश दिले.
― सचिन सागावंकर , सहायक आयुक्त कुपवाड मनपा
ग्रामीण भागातही दैना
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावळी, तानंग, बामणोली, कानडवाडी ग्रामीण भागात ग्रामस्थांची दैना उडाली. सावळी येथील ओढ्याला पूर आल्यामुळे कुपवाड-तानंग मार्गावरील पूलावरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे शनिवारी काही काळ वाहतूक ठप्प होती.