
सलगरे (ता. मिरज): मिरज पूर्व भागातील सलगरे आणि परिसरातील ग्रामीण रुग्णांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सलगरे येथील नूतन ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले हे आरोग्य केंद्र आता रुग्णांच्या सेवेत पूर्णतः दाखल झाले आहे.
विकासासाठी निधीची तडजोड नाही – आ. सुरेशभाऊ खाडे
या सोहळ्याचे उद्घाटन मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “प्रत्येक गावासाठी विकासनिधी देताना मी कधीही तडजोड केलेली नाही. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या दारात दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हाच आमचा उद्देश आहे. मतदारसंघात कोट्यवधींचा निधी थेट जनतेच्या सेवेसाठी वापरण्यात आला असून, ही सुसज्ज रुग्णालये त्याचेच प्रतीक आहेत.”

पक्षीय भेदापलीकडे जाऊन विकासकामे – जयश्रीताई पाटील
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी विशेष अतिथी म्हणून आपली उपस्थिती लावली. त्यांनी आ. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “भाऊंनी कधीही पक्षीय भेदभाव न करता विकासाची कामे मार्गी लावली आहेत. विकासकामांच्या बाबतीत त्यांनी दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे.” यावेळी त्यांनी तानाजी पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत भावनिक सादही घातली.
“सुरेशभाऊंसोबत आधीच यायला हवे होते” – तानाजी पाटील
यावेळी तानाजी पाटील यांनी महत्त्वाची ग्वाही दिली. ते म्हणाले की, “हे रुग्णालय उभारताना आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. जर आम्ही आधीच सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत आलो असतो, तर गावाला अनेक सुविधा वेळेत मिळाल्या असत्या आणि विकासाचे नुकसान टळले असते. इथून पुढे आम्ही कायम सुरेशभाऊंसोबतच राहून काम करू.”
आरोग्य केंद्राची वैशिष्ट्ये:
- एकूण खर्च: ४ कोटी रुपये.
- सुविधा: ऑक्सिजन बेडसह सुसज्ज इमारत.
- व्याप्ती: मिरज पूर्व भागातील अनेक गावांसाठी केंद्रबिंदू.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला तालुका आरोग्य अधिकारी अतुल वाठारकर, डॉ. अक्षय शेटे, डॉ. ओंकार नानावरे, डॉ. अमोल चव्हाण, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके, ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या वनभोजनाचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.