
महाराष्ट्रात मराठा समाजाचे वीस खासदार पात्रता नसतानाही मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आले. परंतु, एकानेही लोकसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली नाही.मराठ्यांना ओबीसीतून मिळणारे आरक्षण टिकेल. आजचा मराठा हा मुळचा कुणबी आहे. कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत असे थोर इतिहास तज्ञ प्रा.डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणाले.
ते आरग (ता.मिरज) येथील आयोजित मराठा समाजाच्या प्रबोधन मेळाव्यात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अजितराव घोरपडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृत सूर्यवंशी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा जनजागृती व भव्य शांतता रॅली सांगली येथे गुरुवारी ८ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा प्रबोधनकार मेळावा झाला.
पुढे डॉ.कोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात ११० मुलांनी आत्महत्या केल्या. राजकारण बाजूला ठेवून महायुती आणि महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. जे संविधानिक आरक्षण आहे. सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे.
अजितराव घोरपडे म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत ताठ मानेने लढा.आपल्या मताचा वापर योग्य करा. जो आरक्षण देईल त्याच्या पाठीशी समाजाने उभा राहावे.सरकारला आरक्षण द्यावेच लागेल.
यावेळी मिरज पूर्व भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.