
पुणे, ता.३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती तसेच लिपिकांच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया मोहिमस्तरावर हाती घेण्यात आली होती, यामाध्यमातून जिल्ह्यात ६१ कार्यालयात एकूण ७५९ उमेदवारांना चार ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र-२०४७ या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा केवळ प्रशासकीय दृष्ट्या नाही तर नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून अनुकंपा नियुक्ती व लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथून राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहे. या कार्यकमात १० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती केली जाणार आहे. ‘महा-भरती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासन पद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे.
जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वाद्वारे गट क पदावर १५५, गट ड पदावर २४४ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ३६० असे एकूण ७५९ उमेदवरांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. “शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल —–प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील